Property Inheritance Rule: वडिलांनी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र करून सगळी संपत्ती मुलाला दिली आणि बहिणीला मृत्यूपत्राने काहीच दिले नाही. आता मुलाच्या हयातीमध्ये या संपत्तीत मुलाची बायको-मुलांचा आणि बहिणीचा हक्क असतो का? वारसा हक्क कायदा काय सांगतो?
आमचे वडील दोन वर्षांपूर्वी गेले. आमच्या वडिलांनी एक नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले आहे. त्यायोगे त्यांनी सर्व मिळकत मला दिली आहे आणि माझ्या बहिणीला मृत्यूपत्राने काहीच दिले नाही. कारण तिला लग्नात जे काही द्यायचे ते दिले होते असे नमूद केले आहे. मी एग्झिक्युटरदेखील आहे. आता माझ्या हयातीमध्ये या फ्लॅटमध्ये माझ्या बायको-मुलांचा आणि बहिणीचा हक्क येतो का?
मोठी बातमी : राज्यात ऑक्टोबरपासून पोलीस भरती.Police Recruitment 2025
एखाद्या मिळकतीमध्ये मालकीहक्क नोंदणीकृत – खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप पत्र यांसारख्या दस्ताने हयातीमध्ये तबदील केला जाऊ शकतो. तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल, तर वारसाहक्काने तबदील होऊ शकतो. मृत्यूपत्राप्रमाणे मालकीहक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक्ती (टेस्टेटर) मयत झाल्यावरच प्राप्त होतो आणि मृत्युपत्राने मिळालेली मिळकत ही स्वकष्टार्जित समजली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत ही तुमची स्वकष्टार्जित मिळकत समजली जाईल.
अर्थात मिळकत मुंबईमध्ये आहे आणि मृत्युपत्र मुंबईमध्ये केले आहे असे गृहीत धरून तुम्हाला आधी कायद्याप्रमाणे मृत्यूपत्राचे प्रोबेट घेणे अनिवार्य आहे. प्रोबेट म्हणजे सोप्या शब्दांत कोर्ट संबंधित मृत्युपत्र कायद्याप्रमाणे केले आहे, असे नमूद करून त्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करते.
कायद्याप्रमाणे मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे मिळकत असेल किंवा या ठिकाणी मृत्युपत्र केले असेल तर प्रोबेट घेणे अनिवार्य आहे, मात्र इतर ठिकाणी प्रोबेट घेण्याची सक्ती करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रोबेट सर्टिफिकेट मिळाल्यावरच मृत्युपत्राप्रमाणे अंमलबजावणी करून घेता येईल.
भारतीय वारसा कायद्याप्रमाणे कोणत्याही सज्ञान आणि ज्याची मानसिक स्थिती सुदृढ आहे अशा व्यक्तीस स्वतःच्या स्वकष्टार्जित मिळकतीसंदर्भात मृत्युपत्र / इच्छापत्र / विल करता येते. तर वडिलोपार्जित मालमत्तेमधील आपला अविभक्त हिस्सादेखील मृत्युपत्राद्वारे देता येतो. मृत्यूपत्रास स्टॅम्प-ड्युटी लागत नाही, मृत्युपत्राची नोंदणी करणेही कायद्याने बंधनकारक नाही (परंतु प्रॅक्टिकली नोंदणी करून ठेवणे उत्तम).
त्यामुळे खरेदी खत, बक्षीसपत्र इ. दस्तांच्या तुलनेत मृत्यूपत्र तुलनेने कमी खर्चाचा दस्त ठरतो. मृत्यूपत्र कायदेशीर ठरण्यासाठी मृत्यूपत्रावर टेस्टेटरने आणि लाभार्थी नसलेल्या कोणत्याही दोन सज्ञान साक्षीदारांनी एकमेकांसमक्ष मृत्यूपत्रावर सही करणे गरजेचे आहे. पण दोन्ही साक्षीदारांनी एकाचवेळी सही करणे आणि साक्षीदारांना मृत्युपत्रात काय लिहिले आहे हे माहिती असणे, गरजेचे नाही. शक्यतो साक्षीदार हे आपल्यापेक्षा कमी वयाचे असल्यास अधिक उत्तम.
मृत्यूपत्राशेवटी मृत्युपत्र करणाऱ्याची शारीरिक व मानसिक स्थिती चांगली आहे असे प्रमाणित करणारे डॉक्टर सर्टिफिकेट असणे कायद्याने सक्तीचे नसले, तरी परत प्रॅक्टिकली असे सर्टिफिकेट असणे केव्हाही चांगलेच. मृत्यूपत्र हे कितीही वेळा बदलता येते आणि सर्वात शेवटचेच मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाते.
आपली स्वकष्टार्जित मिळकत कोणाला द्यायची हा आपला हक्क असला तरीही आपल्याकडे (फक्त) मुलींबाबत “लग्नात सर्व दिले आहे म्हणून तिला काहीही द्यायचे नाही ” असे सर्रास लिहिलेले आढळते आणि कुठेतरी हे खटकते.
समजा बहिणीला हे मृत्युपत्र मान्य नसेल, तर मृत्युपत्राला कोर्टात आव्हान देणायचा हक्क तिला आहे आणि हे मृत्युपत्र वैध आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. ‘तुटे वाद, संवाद तो हितकारी’ हे समर्थ वचन तुम्हाला उपयोगी पडेल.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा