Shivsena MLA Join BJP Update:राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे. सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरू असून, विशेषतः भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते व पदाधिकारी प्रवेश करत आहेत. याचा सर्वाधिक परिणाम शिवसेना शिंदे गटावर होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक नेते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे महायुतीतील वातावरणात तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक मोठा दावा करत राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढलं. शिंदे गटातील तब्बल 22 आमदार भाजपच्या गळाला लागले असल्याचा त्यांचा महत्वाचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे महायुतीतील तणाव अधिक तीव्र झाला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर देत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. (Shivsena Shinde Group)
फडणवीसांची स्पष्ट भूमिका:
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं. “उद्या कोणीही उठून म्हणेल की आदित्य ठाकरे यांचे वीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. पण अशा म्हणण्याने काही सिद्ध होत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. शिंदे गटातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा कोणताही विचार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.
फडणवीस म्हणाले, “आम्हाला शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना हा आमचा मित्र पक्ष आहे व तीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे त्यांचे आमदार आमच्याकडे आणण्याचा प्रश्नच येत नाही.” तसेच महायुती आणखी मजबूत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “आम्ही अशा प्रकारचं राजकारण करत नाही. उलट शिवसेना अजून मजबूत व्हावी, यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत,” असं फडणवीस म्हणाले.
Shivsena Shinde Group | शिवसेना-भाजपमध्ये ताणतणाव? :
अलीकडेच शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने महायुतीतील नाराजी प्रकर्षाने पुढे आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा अधिक रंगल्या. याच वातावरणात आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनी आणखी खळबळ उडवली आहे.
शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये झालेली धडाधड इनकमिंग ही देखील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे महायुतीचे समीकरण बदलत आहे का, की ही फक्त निवडणुकीपूर्वीची राजकीय हालचाल आहे, यावर लक्ष केंद्रित झालं आहे. मात्र भाजपने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे तात्कालिक तणाव किती खरा आणि किती राजकीय आहे, हे पुढच्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे करा